अमळनेर: जून व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मंजूर झाली असून 30 गावांतील शेतकऱ्यांना सुमारे पावणे सात कोटींचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पातोडा परिसरातील 18 गावे आणि शिरुड मंडळातील 14 गावे या ठिकाणी हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्काळ पंचनामा करून मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता. त्यावेळी अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री होते आणि त्यांनी राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले होते. अखेर शासनाने या मदतीस मंजुरी दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
जून 2024 मधील बाधित गावे:
शिरुड मंडळातील खडके, जवखेडे, पिंपळे बुद्रुक, शिरुड, इंद्रा पिंपरी, डांगर बुद्रुक, रणाईचे बुद्रुक, अंचलवाडी, रणाईचे खुर्द, लोंढवे, निसरडी, वाघोदा यांसह 12 गावांतील शेतकऱ्यांना 1 कोटी 55 लाख 14 हजार 386 रुपयांची मदत मिळणार आहे.
ऑगस्ट 2024 मधील बाधित गावे:
पातोडा परिसरातील पातोडा, नांद्री, खवशी बुद्रुक, दापोरी बुद्रुक, धावडे, धुरखेडा, कामत वाडी, मुंगसे, दापारी खुर्द, रुंधाटी, मठ गव्हाण, नालखेडा, गंगापूरी, खापर खेडा प्र ज, जळोद, खेडी खुर्द प्र ज, खेडी सीम प्र ज या 18 गावांतील शेतकऱ्यांना 5 कोटी 28 लाख 63 हजार 28 रुपयांची मदत मिळणार आहे.
शासनाने मंजूर केलेली ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल.